154. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेख क्र. 35/5 मध्ये आपण एका गृहितकाच्या आधारे आर्थिक विषमता समजून घेतली होती. आजच्या लेखातून "भारतातील आर्थिक विषमता" जाणून घेऊया...
भारतातील आर्थिक विषमता समजून घेण्याकरिता 'ऑक्सफॅम अहवाल (Oxfam Report)' हा महत्वाचा दस्तऐवज आहे. या अहवालाच्या मते, भारतातील 10 टक्के लोकांकडे एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या 77 टक्के संपत्ती एकवटलेली आहे. एकीकडे 2017 मध्ये निर्माण झालेल्या संपत्तीचा 73 टक्के वाटा 1% श्रीमंत व्यक्तींकडे गेलाय. अन् दुसरीकडे 670 दशलक्ष जनतेच्या संपत्तीत केवळ 1% वाढ झाल्याचे अहवाल नमूद करतो.
भारतातील सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या 'आरोग्य सेवाही' मिळत नाही. आरोग्यविषयक खर्चामुळे दरवर्षी 63 दशलक्ष लोकांच्या वाट्याला 'गरिबी' येते. एका आघाडीच्या भारतीय वस्त्र कंपनीतील सर्वोच्च पगाराच्या अधिकाऱ्याला एका वर्षात मिळणाऱ्या कमाईइतके पैसे मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील एका किमान वेतन कामगाराला 941 वर्षे लागतील. हे आर्थिक विषमता स्पष्ट करणारे उदाहरणही ऑक्सफॅम अहवाल अधोरेखित करतो.
वसाहतवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, नव-वसाहतवाद (Neo-Colonialism), क्रोनी कॅपिटॅलिजम (Crony Capitalism), आर्थिक समतेच्या प्रस्थापनेस राज्यसंस्थेचे अपयश इत्यादी मुख्य कारणांमुळे आर्थिक विषमता वाढीस लागते.
'आर्थिक समतेच्या' तत्वातूनच आर्थिक विषमतेचा प्रश्न सोडवता येणार असल्याने आर्थिक समतेच्या तत्वाकडे भारताने वाटचाल करायला हवी..!
~ सचिन विलास बोर्डे
36/1
Economic Inequality | Poverty | Inequality | Economics | Society | Development | SocioEconomic Conditions | Crony Capitalism | Economic Equality | Health | Oxfam Report | Colonialism
NEXT 🔹 PREVIOUS
Comments
Post a Comment