18. विकासाच्या वाटेवरील भारत!
नुकताच आपण प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. त्यासंदर्भात हा लेख सादर करीत आहे. 74 वर्षापूर्वी भारताला नियमांचा संच तथा योग्य दिशादर्शक असे संविधान प्राप्त झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. तीच लोकशाही जी लोकांद्वारे लोकांसाठी चालविली जाते. जे लोक लोकशाही चालवीत आहेत त्यांची स्थिती अन् ज्यांच्यासाठी चालविली जात आहे त्या नागरिकांची परिस्थिती याचे विश्लेषण करण्याची मला गरज वाटत नाही. ती वास्तविकता आपण सगळे जगत आहोत. थेट संविधानाचे आकलन न करता आपण प्रस्तावनेचे विश्लेषण करूया. शालेय जीवनात आपण संविधानाची प्रस्तावना तोंडपाठ करण्यावर भर दिला, आकलन मात्र शून्य..! नंतर त्या दस्तऐवजाकडे पाहण्यासाठी नागरिकांना वेळच मिळेना. हे भारतीय नागरिक संसार, नौकऱ्या, सण-समारंभ, जातीय मतभेद, चित्रपट, सोशल मीडिया यातच गुरफटून गेलेत. ही शैक्षणिक मागासतेची लक्षणे. "प्रस्तावनेचे विश्लेषण" - संविधानाचे सार प्रास्ताविकेत प्रतिबिंबित होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही ही सार्वभौम राज्यसंस्थेची वैशिष्टे असतील. सर्वांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा; विचार करण्याचे तथा विचार मांडण्...