116. विकासाच्या वाटेवरील भारत!
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचे वृत्त नेहमीच कानावर पडते. अलीकडेच 'पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या' केल्याचं वृत्त वाचनात आलं.
बेंगळुरूतील "अतुल सुभाष" या 34 वर्षीय अभियंत्याने 24 पानी सुसाईड नोटमध्ये आणि दीड तासाच्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे पत्नी, पत्नीचे नातेवाईक आणि उत्तर प्रदेशातील एका न्यायाधीशाने केलेल्या छळामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं स्पष्ट केलंय.
'वैवाहिक वादामुळे' त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर अनेक 'खोटे गुन्हे' दाखल केलेत तसेच सेटलमेंट साठी 3 कोटी रुपयांची मागणी पत्नीने केल्याचंही त्यांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केलंय.
या संपूर्ण प्रकरणामुळे स्त्रीविषयक कायदे तथा नियमांचा होणारा गैरवापर आणि कायद्यामध्ये पुरुषांकडे होणारे दुर्लक्ष या दोन बाबी चर्चेचा विषय बनल्या आहेत.
भारतातील स्त्रियांसाठी काही विशेष तरतुदी/कायदे राज्यसंस्थेने पारित केले आहेत. स्त्रिया सक्षम व्हाव्यात ही यामागील भूमिका. या तरतुदींचा स्वहितासाठी गैरवापर व्हायला नको.
स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक छळाची प्रकरणे साधारणपणे तातडीने नोंदविली जातात अन् त्यावर जलद गतीने न्यायनिवाडा केला जातो. हे योग्यच. मात्र 'पुरूषांचाही मानसिक अथवा शारीरिक छळ होऊ शकतो' ही बाबच अनेकांना हास्यास्पद वाटते. परिणामी अशा प्रकरणांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. हीच भूमिका आता आपल्याला बदलावी लागेल.
पुरूषांचाही छळ होतो, कायदे/नियमांत पुरुषांच्या हिताचाही विचार व्हायला हवा हे अतुल सुभाष प्रकरणाने अधोरेखित केले आहे. समाज माध्यमांवरही अशाच आशयाची चर्चा बघायला मिळतेय.
'कायद्यापुढे समानतेचे तत्त्व' वास्तवात यावे, अतुल सुभाष प्रकरणाची सखोल तपासणी व्हावी अन् शासन-प्रशासन-न्यायालयाने योग्य भूमिका घ्यावी हीच अपेक्षा..!
~ सचिन विलास बोर्डे
27/3
Men Too | Atul Subhash | Harrasment | Suicides In India | Family Disputes | Domestic Violence | Men Empowerment | Mental Health | Legal System | Justice | Equality Before Law | Gender Equality | Social Issues | Society
Comments
Post a Comment