112. विकासाच्या वाटेवरील भारत!
आमदारांच्या स्थितीविषयक अहवालाचे विश्लेषण आपण मागील लेखात बघितले. आजच्या या लेखातून "मतदारांची स्थिती" आपण जाणून घेऊयात. (खरेतर मतदारांच्या भूमिकेचे विश्लेषण मी लेख क्र. 18/4 मध्ये केले होते. याच लेखाची पुनर्मांडणी अलीकडेच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात करीत आहे.)
एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा सत्तेत येण्याकरीता कमालीचा खटाटोप सुरूय तर दुसरीकडे कुठल्या पक्षाला सत्तास्थानी पोहोचवावे याची जबाबदारी मतदारांवर येऊन पडलीय. थोडक्यात, महाराष्ट्राची येणाऱ्या पाच वर्षांकरिता विकासाची दिशा ठरविण्याची 'संयुक्त जबाबदारी' राजकीय पक्षांची आणि मतदारांची असेल.
पक्षांना सत्तेत येण्यासाठी मतदार महत्वाचा ठरतो. निवडणुका जवळ आल्या की, या पक्षांद्वारे 'मोहक आश्वासनांचा अन् मोहक जाहीरनाम्यांचा' भडिमार व्हायला सुरुवात होते. विकास कामे गतिमान व्हायला लागतात. छुप्या पद्धतीने 'पैसा-दारू-मांस' इत्यादी इत्यादी वितरीत केल्या जाते. मतदात्यांना आपल्याकडे कसे खेचता येईल याचा हा खटाटोप.
पुरेशी 'राजकीय समज' नसल्याने मतदारही यांस बळी पडतो. शेवटी 'बेजबाबदार अन् अस्थिर शासन' सत्तेवर येते.
अन् मनमानी स्वरूपाचा कारभार सुरू होतो. जनतेची सेवक असलेली ही नेते-मंडळी जनतेवरच अधिपत्य गाजवायला सुरुवात करतात. लोकशाहीच्या आडून हुकूमशाहीच फोफावल्याच चित्र निर्माण होत.
यामुळेच आपले अमूल्य मत नोंदविण्यापूर्वी चौकस बुद्धीने विचार करा. विविध पक्षांच्या जाहीरनाम्यावर चिकित्सकपणे विचार करा. निवडून येण्याकरीता उभ्या असलेल्या उमेदवाराचा महत्त्वाचा तपशील जाणून घ्या. अन् नंतर ठरवा कुणाला मत द्यायचंय. तर चला विचारपूर्वक मतदान करूया अन् जनतेच्या योग्य सेवकांना निवडूया..!
~ सचिन विलास बोर्डे
26/3
Maharashtra Vidhansabha Election 2024 | State Assembly Elections/Legislative Assembly Elections | Member of Parliament (MLA) | Politics | Society | Voting Awareness | Democracy | Voters | Political Parties
Comments
Post a Comment