88. विकासाच्या वाटेवरील भारत!
नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे "दहावी आणि बारावीचे निकाल" जाहीर झालेत. या परीक्षांत अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क मिळविले.
पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक दालने खुले होतात. आपल्या पाल्याने नेमक्या कुठल्या दालनात शिरावे हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर्कबुद्धीच्या आधारे घेणे महत्वाचे.
उच्च शिक्षणाचे पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोलात रस असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यास डोकेदुखीच ठरते. पालकांनी हा 'शैक्षणिक अन्याय' टाळायलाच हवा. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी.
अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना 'सरकारी नोकरीचे' कमालीचे आकर्षण असते. केवळ 'पद-पैसा-प्रतिष्ठा' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे.
या क्षेत्राची अनिश्चितता आणि आपल्यातील सामर्थ्य ओळखूनच या स्पर्धेच्या रणांगणात उतरायला हवे.
विद्यार्थ्यांनी आपले छंद अन् कौशल्ये पुरेपूर विकसित करावीत. निवडलेल्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी देशाची समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था याबाबतचे सामान्य ज्ञान आत्मसात करावे. कारण 'कप्पेबंद अभ्यास बुध्दीच्या विचार क्षमतेला मर्यादित करतो.'
सारांश, विद्यार्थ्यांचे योग्य निर्णयच सक्षम विद्यार्थी घडविण्यास मदत करतील. अन् हेच सक्षम विद्यार्थी विकसित भारताच्या वाटचालीस योगदान देतील..!
~ सचिन विलास बोर्डे
21/1
Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education | Secondary School Certificate (SSC) Examination | Higher Secondary Certificate (HSC) Examination | Result | Education | Career | Students
Comments
Post a Comment