80. विकासाच्या वाटेवरील भारत!
गेल्या काही दिवसांत "लडाखमधील" पर्यावरण कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते 'सोनम वांगचुक' आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाची चाहूल कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. आपल्या मागण्या पूर्ण होण्याकरिता तब्बल 21 दिवसांचे उपोषण त्यांनी केले.
'कलम 370' रद्द केल्याने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. लडाखची तब्बल 90 टक्के लोकसंख्या ही 'अनुसूचित जमातींची' असल्याने आदिवासी क्षेत्रांच्या संरक्षणासाठीची घटनात्मक तरतूद असलेल्या '6 व्या परिशिष्टात' समावेशाची मागणी सुरुवातीपासून बघायला मिळते. मात्र तिची अद्यापही पूर्तता न झाल्याने लडाखवासियांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला.
जमिनीच्या, संस्कृतीच्या, भाषेच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लडाखला सहाव्या परिशिष्टात समाविष्ट करावे,
लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे शक्य नसल्यास तेथे दिल्लीसारखी विधानसभा स्थापन करावी, लेह आणि कारगिलमध्ये लोकसभेचे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करावे, लडाख मधील तरुणांना नोकऱ्या मिळण्याकरिता स्वतंत्र लोकसेवा आयोगाची स्थापना करावी, अशा प्रमुख मागण्या मांडल्या जात आहे.
लडाखमध्ये मनमानीपणे जमीन खरेदी-विक्रीला वाव मिळाल्यास, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होईल, अनिर्बंध खाणकामास सुरुवात होईल, परिणामी वैशिष्ट्यपूर्ण लडाखच्या अंगभूत वैशिष्ट्यांना धक्का पोहोचेल. जे निश्चितच परवडणारे नसेल.
लडाखचा प्रश्न केवळ लडाखपुरता सीमित राहिलेला नाही. हा प्रश्न आता देशाच्या पर्यावरण, लोकशाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरलाय. या मागण्यांची वैधता तपासून योग्य निर्णय सरकारने घ्यायला हवा..!
~ सचिन विलास बोर्डे
19/1
Leh | Ladakh | Sonam Wangchuk | Hunger Strike | Protest | Article 370 | Sixth Schedule of the Constitution | Democracy | Internal Security | Environment
Comments
Post a Comment