81. विकासाच्या वाटेवरील भारत!
आज आंबेडकरांची जयंती. आंबेडकरांच्या कुठल्या कार्यावर हा लेख सादर करावा, याविषयी गेल्या तासाभरापासून डोक्यात विविध विचार आलेत. अन् अचानक प्रश्न पडला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर..?" या प्रश्नाच्या आधारेच आजचा लेख प्रकाशित करीत आहे.
आज आंबेडकर असते तर, त्यांचा पहिला विरोध इथल्या जाती-धर्मांवर आधारलेल्या आणि फाटा-फुटीच्या राजकारणाला तसेच धर्मनिरपेक्षतेचे तत्व, संवैधानिक निती-मूल्ये धुळीस मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांना असता.
दुसरा विरोध सामाजिक आणि आर्थिक विषमतेला असता.
आजही देशात विविध आधारावर असमानतेची/भेदभावाची अनेक उदाहरणे समोर येतात. आर्थिक विषमतेने कमालीची उंची गाठलेली दिसते. आंबेडकरांनी याचे चिकित्सक विश्लेषण करून यावरील सखोल उपाय-योजना नमूद केल्या असत्या.
तिसरा विरोध त्यांचीच जयंती साजरी करणाऱ्यांना असता. आंबेडकर म्हणाले असते, बहुजनांनो, तरुणांनो! जेवढी ऊर्जा तुम्ही महापुरुषांच्या जयंतीमध्ये नाचण्यासाठी खर्च करीत आहात, तीच ऊर्जा तुम्ही वाचण्यासाठी उपयोगात आणायला हवी. सण-समारंभात, जयंत्यात लाखो रुपयांची उधळण केल्यापेक्षा ग्रंथालये उघडुन त्यात लाखो रुपयांची पुस्तके घाला. ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. गोर-गरीबांची लेकरं शिकतील. पुढे हीच शिकलेली मंडळी दिल्लीच्या तख्तावर आपले अस्तित्व निर्माण करतील. अन् देशाचा विकास साध्य करतील.
मात्र वास्तवातील परिस्थिती अगदी विपरीत. जाती-धर्मांपासून राजकारण सुटेना, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी होईना. अन् तरुणांना आंबेडकर कळेना. असो...
तुम्हीही आंबेडकरांचा शोध घेत असाल तर, मला आंबेडकर पुस्तकात भेटले, तुम्हालाही आंबेडकर पुस्तकातच भेटेल..!
~ सचिन विलास बोर्डे
19/2
14th April 2024 | Ambedkar Jayanti | Bhim Jayanti | Dr. Babasaheb Ambedkar | Polity, Society, Economy | Democracy | Constitution
Comments
Post a Comment