138. विकासाच्या वाटेवरील भारत!
नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बऱ्याच राज्यांच्या शिक्षण मंडळांद्वारे "दहावी आणि बारावीचे निकाल" जाहीर झालेत. या अनुषंगाने लेख क्र. 21/1 पुन्हा प्रकाशित करीत आहे.
उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. आपल्या पाल्याने नेमका कुठला पर्याय निवडावा हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक घ्यायला हवा.
उच्च शिक्षणाचा पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोल आवडीचा असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याकरिता डोकेदुखीच ठरेल. यामुळे पालकांनी हा 'शैक्षणिक अन्याय' करणं टाळायलाच हवं. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी.
अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना 'सरकारी नोकरीचे' कमालीचे आकर्षण असते. केवळ 'पद-पैसा-प्रतिष्ठा' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे.
या क्षेत्राची अनिश्चितता आणि आपल्यातील सामर्थ्य ओळखूनच या स्पर्धेच्या रणांगणात उतरायला हवे.
विद्यार्थ्यांनी आपले 'छंद अन् कौशल्ये' पुरेपूर विकसित करावीत. निवडलेल्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी देशाची समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान याबाबतचे सामान्य ज्ञानही आत्मसात करावे. कारण 'कप्पेबंद अभ्यास बुध्दीच्या विचार क्षमतेला अन् चौकसपणाला मर्यादित करतो.'
विद्यार्थ्यांनो... तुमचे योग्य निर्णयच तुम्हाला सक्षम बनविण्यास मदत करतील अन् तुमचा सक्षमपणाच विकसित भारताच्या वाटचालीस योगदान देईल..!
~ सचिन विलास बोर्डे
32/3
Central Board of Secondary Education (CBSE) | Secondary School Certificate (SSC) Examination | Higher Secondary Certificate (HSC) Examination | Result | Education | Career | Students |
Comments
Post a Comment