137. विकासाच्या वाटेवरील भारत!

22 एप्रिलला काश्मीरातील पहेलगाम येथे दहशतवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादाला प्रत्युत्तर देणे भारतासाठी आवश्यकच होते. परिणामी दहशतवाद्यांना अद्दल घडविण्याकरिता भारताने 07 मे ला "Operation Sindoor" च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केले. हीच बाब तीन मुद्द्यांच्या साह्याने समजून घेऊया...

पहिला मुद्दा, भारताच्या दहशतवादावरील या हल्ल्याचा अर्थ पाकिस्तानने स्वतःवरील हल्ला असा घेतला. अन् भारतावर प्रतिहल्ला करून युद्धास सुरुवात केली. दहशतवादाच्या प्रश्नावर भारत अन् पाकिस्तानने मिळून उत्तरे शोधणे अपेक्षित होते. मात्र दहशतवाद्यांना छातीशी कवटाळणाऱ्या पाकिस्तानकडून ही अपेक्षा ठेवणं अपेक्षाभंगच ठरला.

दुसरा मुद्दा, ज्या उद्देशाने या लष्करी कारवायांची सुरुवात झाली होती तो उद्देश बाजूला होतोय. या युद्धात आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा शिरकाव झालेला दिसतोय.
दोन्ही देशांना इतर देशांचा छुपा पाठिंबा असल्यास अन् बदल्याच्या भावनेच्या चक्रात हे युद्ध अडकल्यास या युद्धाला पूर्णविराम नसेल. जो देश दीर्घकाळ युद्धात गुंतलेला असतो त्या देशाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. अर्थव्यवस्थेची गतिशीलता कमी होते. परिणामी दोन्ही देशांनी वेळीच निर्णय घेतलेले बरे.

तिसरा मुद्दा, या युद्धजन्य परिस्थितीत अनेक दिशाभूल करणाऱ्या बाबीही प्रसारित होताना दिसताय. दिशाभूल होऊन देशांतर्गत अशांतता निर्माण होऊ देऊ नका. दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना, खोट्या अफवांना, फसव्या माहितीला बळी पडू नका. शासनाच्या अधिकृत अकाउंट्स आणि वेबसाइट्सवरील माहितीवरच विश्वास ठेवा.

सारांश, दहशतवाद ही बहुआयामी समस्या असल्याने या समस्येचे उपायदेखील बहुआयामी असावे लागतील. 'दहशतवादी तळांना उध्वस्त केल्याने दहशतवाद संपेल' असा विचार करणे म्हणजे गाफिलपणाच ठरेल..!


~ सचिन विलास बोर्डे

32/2

Operation Sindoor | Terrorism | Pahalgam (Jammu and Kashmir) | India Pakistan Conflict | External Disturbance | War | Society | Politics | Humanity | International Relations | Global Politics 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!