128. विकासाच्या वाटेवरील भारत!
8 मार्चला जगभर "जागतिक महिला दिन" साजरा केला जातो. जगभरातील महिलांना या एकाच दिनी भरपूर महत्व अन् विशेष वागणूक दिली जाते. सर्वच समाज माध्यमांवर शुभेच्छावर्षाव केला जातो. मात्र इतक्याच बाबी पार पाडून महिलांचा विकास आणि महिलांचं सक्षमीकरण शक्य होईल का? हा प्रश्न उरतोच...
इतिहास काळापासूनच महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेने महिलांना 'मूलभूत हक्क नसलेली शोषक समाजरचना' निर्माण केली. या व्यवस्थेने पुरुषांना श्रेष्ठत्व प्रदान केले. ज्यातून 'पुरुषसत्ताक व्यवस्थेने' डोके वर काढले.
स्त्रियांना पुरुषांची लालसा भागविणारी गुलाम अन् मुलांना जन्माला घालणारे एक यंत्र अथवा साधन मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात अनेकांच्या प्रयत्नाने स्त्री-पुरूष समान असलेली व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला गेला. संविधानाच्या चौकटीत ही समतेची व्यवस्था साकारली गेली.
आज बोटावर मोजता येतील इतक्या महिलांनी भली-मोठी प्रगती केली यावरून भारतातील सगळ्याच महिला प्रगत झाल्या असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. आजही स्त्रियांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. विविध रूपातून या समस्या समोर येत आहेत. महिलांच्या समस्येविषयक, महिलांच्या सक्षमीकरणाविषयक विविध लेख मी अनेकदा प्रकाशित केले आहेत. वाचकांनी त्याचाही आढावा जरूर घ्यावा.
महिला दिनाच्या केवळ 'एक दिवसीय शुभेच्छा' देऊन या समस्या सुटणार नाहीत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, शारीरिक अन् मानसिक अशा सर्वच क्षेत्रात महिलांकरिता उपाय-योजना आखाव्या लागतील. 'कारण महिलेच्या विकासावरून समाजाचा विकास ठरेल अन् समाजाच्या विकासातूनच देशाचा विकास साध्य होईल..!'
~ सचिन विलास बोर्डे
30/2
8 March | International Women's Day | Women Empowerment | Gender Equality | Social Issues | Society | Awareness | Patriarchy | History |
Comments
Post a Comment