129. विकासाच्या वाटेवरील भारत!
सोळाव्या शतकात पुण्याजवळील देहू येथे 'तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)' यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात "तुका, तुकोबा, तुकोबाराया" म्हणून ओळख मिळाली.
सोळाव्या शतकातील समाजाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. समाजातील समाज-जीवन, चाली-रीती, रूढी-परंपरा यावर आपले विचार अभिव्यक्त करण्याकरिता तसेच समाजसुधारणेकरिता, समाज प्रबोधनाकरिता अन् समाजाला योग्य दिशा देण्याकरिता त्यांनी हजारो "अभंगांची" रचना केली.
संत तुकारामांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. त्याकाळी 'नवस केल्याने लेकरं होतात' असा गैरसमज रुजला होता अन् रुजवला गेला होता. यावर तुकोबांनी आपले मत मांडले. ते म्हणतात, "नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।।" अर्थात नवस केल्याने लेकरं झाली असती तर नवरा करण्याची गरज काय? असा प्रश्न तुकोबांनी उपस्थित केला. यातून त्यांची तार्किक बुद्धी अन् वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित होतो.
समाजातील सर्वांनाच समान हक्क-अधिकार असावते या दृष्टिकोनातून ते लिहितात, "ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार। बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही।।"
या अभंगात उल्लेख केलेल्या सर्वच समाज घटनाकांना समान अधिकार असल्याचे ते नमूद करतात.
त्याकाळच्या साचेबंद, कप्पेबंद जात व्यवस्थेला आपल्या लेखणीतून विरोध करण्याचे धाडस तुकोबांनी दाखविले.
परिणामी या कप्पेबंद व्यवस्थेचे धनी असलेल्यांनी तुकारामांचा विरोध केला, छळ केला. तुकोबांचे जहाल अन् विद्रोही लिखाण पचत नसल्याने तुकोबांचे हजारो अभंग इंद्रायणी नदीत बुडविले गेले.
अभंगाच्या प्रति पाण्यात बुडविल्याने तुकोबाच्या विचारांचा प्रवाह थांबू शकत नाही. हा प्रवाह आजही अनेकांच्या बुद्धीत विवेकाला (Reason) जन्माला घालण्याची प्रेरणा देतोय..!
~ सचिन विलास बोर्डे
30/3
Saint | Tukaram Bolhoba Ambile (More) | Tukaram Maharaj | Tuka / Tukoba / Tukobaraya | Abhang | Social Reformer | Society | History | Awareness
Comments
Post a Comment