101. विकासाच्या वाटेवरील भारत!
मे महिन्यात लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता. महाराष्ट्रात सत्तास्थानी असलेल्या पक्षाची बऱ्याच ठिकाणांहून झालेली हार या निकालात बघायला मिळाली होती. आणि लवकरच 'विधानसभा निवडणुका' होणार होत्या.
आगामी विधानसभेतील हार टाळण्यासाठी अन् मतदाराला आपल्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी विविध 'आकर्षक योजनांचा' भडिमार सुरू केला. याच पार्श्वभूमीतून आकाराला आली "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना"...
या योजनेचा उगम मध्यप्रदेशातला. तिकडे मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू केली गेली. या योजनेने मध्यप्रदेशात लोकसभेत भाजपच्या विजयाला मोठा हातभार लावल्याची चर्चा झाली.
मात्र महाराष्ट्रात या योजनेचा उद्देश 'महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे' हा सांगितला जातोय. हा उद्देश साध्य होईल का? सरकारकडे या योजनेचा निधी कुठून येणार? या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर किती ताण पडणार? ही योजना कधीपर्यंत चालणार? या प्रश्नांत सामान्य जनतेला रस नाही.
या योजनेतून मिळणारे पैसे अनेकांना गरजेचे असतीलही, ते आवश्यक बाबींवर हा पैसा खर्च करतीलही मात्र नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी/सक्षम करण्यासाठी अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन धोरणे राबवावी लागतात.
असो, ही योजना आता नागरिकांची आणि सत्ताधाऱ्यांची परीक्षा असेल. अन् या परीक्षेचा पुढीलपैकी कोणताही एक निकाल लागेल. या योजनेमागे स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाचा हेतू असल्यास ही योजना दीर्घकाळ चालेल. किंवा या योजनेमागे राजकीय स्वार्थ असल्यास या योजनेचा अंत लांब नसेल..!
~ सचिन विलास बोर्डे
24/1
Maharashtra | Loksabha Election | Vidhansabha Election / Legislative Assembly Elections | Mukhyamantri Ladki Bahin Yojana | Economically Independence | Women Empowerment | Economics | Politics
Comments
Post a Comment