98. विकासाच्या वाटेवरील भारत!
कुठल्याही देशात 'विद्यार्थी' हे त्या देशाची दिशा ठरविण्यात फार मोठी भूमिका बजावतात. देशाची धोरणे विद्यार्थ्यांच्या हिताची असल्यास देशाच्या विकासास हातभार लागतो अन् राज्यव्यवस्थेची धोरणेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधी असेल तर त्या 'राज्यव्यवस्थेची उलथापालथ' होते.
हाच निष्कर्ष आपल्या शेजारच्या "बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेतून" काढता येईल.
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. त्यास हिंसक वळण लागले. संचारबंदीही आंदोलनास रोखू शकली नाही. शेवटी प्रधानमंत्रीने राजीनामा देत देश सोडला.
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारतासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत. उदा. सीमा सुरक्षा, बांगलादेशातील भारतीयांची सुरक्षा, व्यापार.
भारताशेजारील पाकिस्तान अथवा चीन या देशांच्या बांगलादेशातील कुरापतींबद्दल भारताला अधिक सावध/सजग/दक्ष राहावे लागणार आहे.
यापूर्वी भारत-बांगलादेश संबंध सहकार्याचे राहिले आहे. मात्र आता बांगलादेशात सत्तास्थानी कोण असेल यावरून पुढील सहकार्याचा ताळमेळ बसवावा लागणार आहे.
शेख हसीनांच्या कार्यकाळात बांगलादेशाची बऱ्यापैकी आर्थिक वाढ झाली. मात्र पुरेश्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाही. यातूनच विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला बळ मिळाले.
देशाचा नुसता GDP चा आकडा वाढवून देशाचा विकास होत नसतो. त्यासाठी 'सर्वसमावेशक आर्थिक विकासाची' धुरा हाती घ्यावी लागते. तेव्हाच देशाचा अर्थकारणाचा गाडा सुरळीत चालतो. अर्थकारण सुरळीत असेल तर राजकारणही सुरळीत चालते. हेच बांगलादेशाच्या अस्थिरतेतून शिकण्यासारखे..!
~ सचिन विलास बोर्डे
23/2
Bangladesh | Dhaka | Political Crisis | Student Protest |Reservation | Unemployment | Economic Crisis | Democracy | Military Rule | Politics | International Relations
Comments
Post a Comment