74. विकासाच्या वाटेवरील भारत!
सध्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या 'भरती प्रक्रिया' मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक शासकीय आणि खाजगी संस्थांच्या मदतीने विविध पदे भरली जात आहेत.
राज्यातील अनेक विद्यार्थी ही पदे मिळविण्याकरिता तयारी करत असतात. यशस्वी झाल्यानंतर हे तरुण अधिकारी 'लोकाभिमुख प्रशासन' चालवतील अशी अपेक्षा असते.
मात्र या पदभरतीची चिकित्सा केल्यास यातील त्रुटी लक्षात येतात.
महसूल, शिक्षण, नगरविकास, जलसंपदा, शिक्षक भरती, तलाठी भरती अशा अनेक विभागांच्या भरती प्रक्रियांमध्ये पेपर फुटल्याची, भ्रष्टाचार झाल्याची चर्चा हल्ली सगळीकडे होताना दिसते. वृत्तपत्रांमध्ये देखील याविषयीचे अनेक वृत्त प्रकाशित होत असतात.
एकीकडे हा विद्यार्थी वर्ग मोठ्या मेहनतीने परीक्षांची तयारी करत असतो, अन् दुसरीकडे हा भ्रष्टाचार, पेपर फुटीचे प्रकरणे या बाबी विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम करत असतात.
परिणामी या विद्यार्थी वर्गाचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत व्हायला लागतो. 'शासन-प्रशासनच भ्रष्ट असल्याने आपण प्रामाणिकता का जपायची, अशी नकारात्मक मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला लागते.' अन् शेवटी ते देखील या भ्रष्टाचारात सहभागी होतात.
भ्रष्टाचाराला पूर्णपणे प्रतिबंध घालणे कठीणच. मात्र त्याचे नियमन केले जाऊ शकते. भ्रष्टाचाराच्या नियमनाकडे राज्यशासन तातडीने लक्ष पुरवेल तसेच शासकीय पदभरती पारदर्शकपणे, जबाबदारीने पार पाडेल; अधिकारी झालेला आणि होणारा विद्यार्थी वर्ग नैतिक मूल्यांची जोपासना करेल, हीच अपेक्षा ठेवत सदरील लेखणीला पूर्णविराम देतो..!
~ सचिन विलास बोर्डे
17/4
Maharashtra Government | Employment Generation | Students | Government Exams | Government Services | Corruption | Paper Leak
Comments
Post a Comment