75. विकासाच्या वाटेवरील भारत!
दोन-चार दिवसांपूर्वी मनाला खिन्न, निराश, हताश, चिंतित करणारे वृत्त वाचनात आले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बर्डीपाड्याची रहिवासी 'कविता राऊत' नामक गर्भवती मातेविषयीचे हे वृत्त.
तारीख 15 फेब्रुवारी, वेळ रात्रीची. दिवस भरलेल्या या गर्भवती मातेला प्रसूतीवेणा/कळा सुरू झाल्या. उपचारासाठी तिला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली खरी, मात्र ती वाटेतच बंद पडली. अन् त्या बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतच त्या मातेची प्रसूती झाली. मात्र तिची प्रकृती खालावली.
काही वेळानंतर दुसऱ्या रुग्णवाहिकेने तिला ग्रामीण रुग्णालयात नेले. पण तिथे पुरेश्या सुविधा नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालय गाठण्यापूर्वीच या मातेने आपला जीव गमावला...
दुर्गम भागातील 'सरकारी आरोग्य व्यवस्थेवर' शासन-प्रशासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षाचे हे फलित.
आरोग्य अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, बंद पडणाऱ्या रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालयात आवश्यक साधन-सुविधांचा अभाव, आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा या सर्वच बाबी या मातेच्या मृत्यूस जबाबदार धरण्यास कुठलीही शंका असू नये.
कोणास ठाऊक अशा कित्येक स्त्रियांना केवळ आरोग्य व्यवस्थेच्या अपयशामुळे आपले प्राण गमवावे लागले.
'कार्यक्षम' आरोग्य यंत्रणेच्या स्थापनेकरिता राज्यकर्त्यांनी आपला सत्तेचा हाव बाजूला सारत थोडे-बहुत लक्ष याकडेही पुरवायला हवे. डॉक्टरांनीही आपल्या स्वार्थीपणाचा, निष्काळजीपणाचा, बेफिकिरीचा 'उपचार' करायला हवा. कारण आणखी एखाद्या कवितेचा मृत्यू मानवतेसाठी परवडणारा नाही..!
~ सचिन विलास बोर्डे
18/1
Kavita Raut | Pregnancy | Maternal Mortality | Health | Government Hospital | Responsibility Of Doctors | Remote Villages
Comments
Post a Comment