125. विकासाच्या वाटेवरील भारत!

"आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेमविवाहाला" कुटुंबीयांचा अन् इथल्या सामाजिक व्यवस्थेचा कायमच विरोध राहिलेला आहे.

आपल्या लेकरांनी आंतरजातीय विवाह केल्यास आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल, समाज आपल्याला जातीबाहेर टाकेल अशी भिती समाजात खोलवर रुजवली गेली. परिणामी आंतरजातीय विवाहाला इथल्या समाजव्यवस्थेने अन् जातव्यवस्थेने प्रोत्साहन दिलेच नाही.

अशा विविध कारणांमुळे अनेक तरुण-तरुणींनी 'पळून जाऊन लग्न केल्याची' उदाहरणे हल्ली सर्वत्र दिसून येत आहे.
मात्र असा प्रेमविवाह केल्यानंतरही कुटुंबियांकडूनच त्यांचा छळ होत आहे, असेही ऐकण्यात येते. बऱ्याचदा हाच छळ 'ऑनर किलिंग' चे रूप घेतो. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींनीचा कुटुंबातील सदस्यच खून करतात. अशाच घटना छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर, बीड इत्यादी जिल्ह्यात घडलेल्या दिसतात.

अशा ऑनर किलिंगच्या घटनांना थांबविण्याकरिता आणि प्रेमविवाह करणाऱ्यांना सुरक्षा देण्याकरिता "सुरक्षा गृह (Safe House)" तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.

प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींच्या जीवाला धोका असल्यास सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांचा पहारा असलेल्या सेफ हाऊस मध्ये एक महिना ते एक वर्षांपर्यंत राहता येणार आहे. गृहमंत्रालयाकडून सर्वच पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा अधिक्षक कार्यालयांना सेफ हाऊस तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात असे सेफ हाऊस निर्माण करण्यात येतील.

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून या निर्णयाची वास्तवात अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे. सेफ हाऊस ची संकल्पना इतर राज्यांसाठीही दिशादर्शक ठरेल.

सेफ हाऊस सारख्या उपाययोजना होतच राहतील, खरा बदल समाजाच्या मानसिकतेत घडवावा लागेल कारण जर इथल्या समाजव्यवस्थेने प्रेमविवाहाला संमती दिली असती तर कदाचित 'सैराट' चा शेवटही आनंदाने झाला असता..!

~ सचिन विलास बोर्डे

29/3

Maharashtra | Interfaith and Intercaste Marriage | Love Marriage | Honour Killing | Safe House | Police Protection | Youths | Society | Awareness

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!