144. विकासाच्या वाटेवरील भारत!
शिक्षण का घेतलं जात? या साध्या प्रश्नाचं उत्तर "नोकरी" अस देता येतं. भारतामध्ये शिक्षणाकडे नोकरी मिळविण्याचे साधन या दृष्टीनेच बघितल्या जाते. परिणामी चांगल्या नोकरीकरीता चांगल्या शिक्षणाची आवश्यकता गरजेची वाटते.
नोकरी मिळविण्याकरिता परीक्षा द्याव्या लागतात. कॉलेज मिळवून देणाऱ्या 'प्रवेश परीक्षा' असो किंवा नोकरी मिळवून देणाऱ्या 'स्पर्धा परीक्षा' असो दोन्हींकडे लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षांची तयारी करतात, परीक्षा देतात अन् त्यातले मोजकेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात.
उत्तीर्ण होण्यासाठी कसून मेहनत घ्यावी लागते. अन् विद्यार्थी ही मेहनत तेव्हाच घेतात जेव्हा ते या क्षेत्रांत 'स्वतःच्या इच्छेने' आलेले असतात. मात्र वास्तविकता जराशी वेगळी आहे. विद्यार्थ्यांच्या इच्छा बाजूला सारून 'पालकांच्या इच्छा' वरचढ होताना दिसताय. पालकवर्ग जबरदस्तीने त्यांच्या लेकरांना डॉक्टर, वकील, इंजिनियर इत्यादी व्हायला सांगत असतील तर या परीक्षांचा अभ्यासक्रम लेकरांना डोईजडच होणार आहे.
'तुला जास्त मार्क्स मिळवावेच लागतील, तुला चांगलं कॉलेज मिळायलाच हवं अन् शेवटी तुला नोकरी लागायलाच हवी' असा पालकांचा सक्तीचा अट्टाहास जीवघेणा ठरू शकतो.
हीच बाब नुकतेच घडलेल्या महाराष्ट्राच्या 'सांगलीतील प्रकरणातून' पुढे येते. नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने 'मुख्याध्यापक पित्याने' आपल्याच 16 वर्षीय लेकीचा जीव जाईपर्यंत मारहाण केली. लेकरापेक्षा नोकरीला महत्व दिल्याचे हे फलीत.
मारहाण करून, सक्ती करून मार्क्स वाढत नसतात. पालकांनी आपल्या लेकरांच्या इच्छाही विचारात घ्यायला हव्या. नोकरीपेक्षा लेकरांना महत्व द्या. कारण काही लेकर शिक्षण क्षेत्रात हुशार असतात तर काही लेकर इतर क्षेत्रात हुशार बनतात. याच काही महत्वपूर्ण बाबी मला सदरील लेखातून अधोरेखित करावयाच्या होत्या..!
~ सचिन विलास बोर्डे
33/5
Maharashtra | Education | Job | Exams | Entrance Exam | Competitive Exams | Students | Career
Comments
Post a Comment