121. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेखात (28/2) आपण घटना समितीच्या संरचनेचा आढावा घेतला. घटना समितीवरील उर्वरित चर्चा आपण या लेखात करूया.
09 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 म्हणजेच 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका कालावधी राज्यघटनेच्या निर्मितीसाठी लागला. या कालावधीत घटना समितीची 11 अधिवेशने झाली.
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता, न्याय्य समाज ही तत्वे मसुद्याची गभातत्वे ठरली.
नागरिकत्व विषयक तरतुदी, नागरिकांचे मूलभूत हक्क-अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, दुर्बल घटकांसाठी विविध घटनात्मक तरतुदी, केंद्र-राज्य संबंध, केंद्र आणि राज्य विधिमंडळांची रचना अशा विविध घटकांवर घटना समितीने सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान दावे-प्रतिदावे उपस्थित करून विविध तरतुदीतील त्रुटींवर चर्चा केली गेली. त्यावर उपाय सुचविले गेले.
घटना समितीद्वारे 22 जुलै 1947 ला 'राष्ट्रध्वजाचा' स्वीकार केला गेला. तसेच 24 जानेवारी 1950 रोजी 'राष्ट्रगीताचाही' स्वीकार करण्यात आला. अशारीतीने घटना समितीने इतरही काही कार्ये पार पाडली.
भारत सरकार कायदा 1935, ब्रिटिश राज्यघटना, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सोव्हिएत, रशिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान या देशांच्या राज्यघटनेचा घटनाकारांनी सखोल अभ्यास केला. अन् भारताला अनुरूप अशा आशयाच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आल्या.
26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केलेल्या संविधानात 22 विभागात 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या.
नंतरच्या काळात काही नवीन तरतुदी (Addition) केल्या गेल्या, काही तरतुदींमध्ये बदल (Variation) केले गेले, आणि काही तरतुदी रद्दबातल (Repeal) केल्या गेल्या.
सद्य:स्थितीत राज्यघटनेत 22 विभागात 395 कलमे आणि 12 अनुसूच्या आहेत.
(क्रमशः)
~ सचिन विलास बोर्डे
28/3
History of the Constitution | Historical Background | Constituent Assembly | Making of the Constitution | Drafting Committee | Cabinet Mission | Polity | National Flag | National Anthem
Comments
Post a Comment