86. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण ICMR ने जारी केलेले 'खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शक तत्वे' जाणून घेतली. ज्यातून आपल्याला पोषक आहारासाठी आवश्यक बाबी समजल्या. 
जसं आहारातील अन्न-घटकात पोषक तत्वे महत्वाची, तसचं कुठल्याही अन्न-घटकात चव अन् स्वादिष्टपणा देखील महत्वाचा. याकरिताच अन्न पदार्थांत विविध "मसाल्यांचा" उपयोग केला जातो.

देशात प्रामुख्याने लवंग, इलायची, मिरच्या, लसूण, आले, हळद, जिरे, कोथिंबीर इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.
विविध व्यापारी कंपन्या या मसाल्यांची देशांतर्गत आणि इतर देशांत विक्री करतात.

अलीकडेच सिंगापूर, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांनी भारतीय मसाल्यांतील घातकपणा उघडकीस आणला. भारतीय मसाले उत्पादकांनी मसाले जास्त काळ टिकण्याकरिता 'इथिलिन ऑक्साईडचा' मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्याचे यातून समोर आले.

"कॉर्सिनोजेन रसायने अथवा इथिलिन ऑक्साईडमुळे कर्करोग होतो. परिणामी हे मसाले जीवघेणे ठरू शकतात."
ही बाब इतर देशांकडून आपल्याला समजली. यातून आपल्या देशातील भारतीय मसाले मंडळ, केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) या संस्थांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. मसाले उत्पादकांनीही नियमावलीचा भंग केल्याचे यातून दिसते.

या सर्व घडामोडी लक्षात घेता, केंद्र आणि राज्य शासनाने तसेच उपरोक्त संस्थांनी तातडीने याकडे लक्ष पुरवायला हवे. अन्यथा चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळेच सर्वसामान्यांचं जगणं 'बेचव' होईल..!


~ सचिन विलास बोर्डे

20/3

Spices Board of India | The Food Safety and Standards Authority of India -FSSAI | Food and Drug Administration - FDA | Trade | Food | Spices | Public Health | Health Issues | Pesticide | Ethylene Oxide | Cancer 


Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!