133. विकासाच्या वाटेवरील भारत!

आजच्या लेखात मनुष्याचे "वैचारिक जग आणि वास्तवातील जग" यांच्या सहसंबंधांची चर्चा करूया. खरेतर याच दोन्ही जगांमध्ये मनुष्याच्या सुख-दुःखाची मुळे शोधता येतात.

मनुष्याकडे विवेक आहे आणि तो विचार करतो यामुळे मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा गणला गेला. याच गुणांमुळे मनुष्याने आजवरची प्रगती साध्य केली. वैचारिक लिखाणातून वास्तवातील जगावर चर्चा केली गेली. अन् यातून
चिद्वाद/आदर्शवाद (Idealism), वास्तववाद (Realism), भौतिकवाद (Materialism) अशा तत्त्वज्ञानाच्या शाखा विकसित झाल्या.

या दुनियेचं अन् या दुनियेतील संकल्पनांच आहे तसंच वर्णन वास्तववाद आणि भौतिकवाद करतो. हा वास्तववादी आणि भौतिकवादी विचार 'काय आहे' या वास्तविक प्रश्नावर अधिकचा भर देतो. याउलट आदर्शवादाचा 'काय असायला पाहिजे' या वैचारिक प्रश्नावर भर असतो. काय आहे आणि काय असायला हवं या मूलभूत प्रश्नांतूनच या विचारांचा उगम झाला.

हेच विश्लेषण आपण आता एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा सर्वांच्या परिचयाची 'प्रेम' ही भावनिक संकल्पना घेतली, तर वैचारिक जगात प्रेम ही भावना मनाला आनंदी करणारी वाटते, मानसिक सुख देणारी वाटते मात्र वास्तविक भौतिक जगात हेच प्रेम बऱ्याचदा मनाला वेदना देणारं अन् दुःखी करणारं जाणवतं.

आपण केलेल्या विचारांचा अन् वास्तविक जगातील परिस्थितीचा ताळमेळ बऱ्याचदा हुकतो. परिणामी डोक्यातील वैचारिक जगाला अधिकचे महत्व द्यावे की वास्तवातील जगाला द्यावे ही दुविधा निर्माण होते. ही दुविधा सोडविण्याकरिता दोन्ही जगांचे आकलन असणे गरजेचे ठरते.

थोडक्यात, मनुष्याच्या विचारांचा वास्तवातील भौतिक जगाशी ताळमेळ बसला की मनुष्य स्वतःला सुखी समजतो, अन् ताळमेळ हुकला की मनुष्य स्वतःला दुःखी मानतो..!

~ सचिन विलास बोर्डे

31/2

Ideology | Philosophy | Idealism | Realism | Materialism | Inner Conflict | Human Behaviour | Emotions 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!