135. विकासाच्या वाटेवरील भारत!
लेख क्र. 30/4 मध्ये ' धर्मावर धर्म घासल्याने ' निर्माण होणाऱ्या आगीचे विश्लेषण आपण बघितले होते. दोन गटांत फूट पडल्याने तिसऱ्या गटाला वर्चस्व मिळवणे सुलभ होते हेही आपण बघितले. नुकत्याच घडलेल्या " पहेलगाम " मधील घटनेनंतर या तिसऱ्या गटात " दहशतवादाचाही " समावेश करावा लागेल. देशांतर्गत असलेल्या धार्मिक फाटा-फुटींचा, जातीय समीकरणांचा आजवर राजकीय पार्ट्यांना अन् राजकारण्यांना सत्ता टिकविण्याकरिता फायदा होत आला. मात्र याच धार्मिक फाटा-फुटींचा फायदा दहशतवादी संघटनाही घेऊ शकतात हे काश्मीरातील पहेलगाम घटनेने सिद्ध केलयं. देशातील सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी आपल्या सोयीनुसार जातीय समीकरणांचा उपयोग करून घेतला. परिणामी दोन धर्मांतील नागरिकांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. दोन्ही धर्मांतील नागरिक एकमेकांपासून दुरावत गेले. आता हा दुरावा अत्यंत टोकाला पोचलेला दिसतोय. ' हिंदू विरुद्ध मुस्लिम ' हेच समीकरण अनेकांच्या डोक्यात फिट झालंय. याच समीकरणाचा फायदा घेत पहेलगाम घटनेने या दुराव्यात भर घातलीय, देशात पुन्हा अशांतता निर्माण केलीय. पहेलगाम घट...