63. विकासाच्या वाटेवरील भारत!
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)' ने नुकताच वार्षिक अहवाल प्रकाशित केलाय. वाढलेली गुन्हेगारी आणि आत्महत्येचे प्रमाण यामुळे हा अहवाल लक्ष्यवेधी ठरतो.
'गुन्हेगारी आणि आत्महत्या' या दोन्हीं मुद्द्यांवर भाष्य होणे महत्वाचे. पण जागेअभावी सदरील लेखात केवळ आत्महत्येविषयीचे विश्लेषण सादर करीत आहे.
अहवालानुसार, 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये आत्महत्येचे प्रमाण 4.2 टक्क्याने वाढले. थोडक्यात 1,70,924 लोकांनी आत्महत्या केलीय. कौटुंबिक समस्या (31.7%), विवाह विषयक समस्या (4.8%), गंभीर आजार (18.4), दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा, बेरोजगारी ई. कारणांमुळे या नागरिकांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आपले अस्तित्व संपविले. दैनंदिन मजुरी (रोजंदारी) करणारे कामगार, शेतकरी यांच्या आत्महत्येचे प्रमाणदेखील अधिक आहे. तसेच जवळ-जवळ 12,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीय.
सर्वाधिक आत्महत्या झालेल्या राज्यात 'महाराष्ट्र' अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये आहेत.
'संतांची भूमी' अशी महाराष्ट्राची ओळख राहिलेली आहे.
"मरावे परी कीर्ती रुपे उरावे" असे दिशानिर्देशक ज्ञान संतांनी या भूमीत रुजवलं, अन् त्याच महाराष्ट्रातील जनता कीर्ती करण्याअगोदरच आत्महत्या करीत आहे.
समस्येला सामोरे जाण्याचं बळ सगळ्याच व्यक्तींमध्ये नसतं, परिणामी शिक्षण-प्रशिक्षण घेऊन, बुद्धीची कवाडे खुली करून जीवनातील समस्यांविषयी चिकित्सा करून ती सोडविली जाऊ शकते.
देशातील नागरिकांनी आत्महत्येसारख्या पळवाटा शोधत बसण्यापेक्षा निर्भिडपणे समस्येला सामोरे जाण्याची मानसिकता विकसित करायला हवी..!
~ सचिन विलास बोर्डे
15/2
National Crime Records Bureau (NCRB) | Suicides | Farmers | Daily Wages Labour
Comments
Post a Comment