60. विकासाच्या वाटेवरील भारत!
अलीकडेच आपण 'दिपावली/दिवाळी' हा आतुरतेने वाट पाहिला जाणारा सण मोठ्या आनंदाने साजरा केलाय. त्यातीलच एक दिवस 'बलिप्रतिपदा/भाऊबीज/पाडवा' ई. नावाने साजरा करतात.
कित्येक वर्षांपासून 'इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो' ही प्रचलित म्हण या दिवशी आपल्या कानावर पडत असते. कुठली इडा-पिडा टळावी?, नेमका हा बळी कोण?, त्याच राज्य का यावं? अशी चिकित्सक प्रश्न आपल्याला न पडणं अन् या प्रश्नांची उत्तरे न मिळणं हा गाफीलपणा आपल्या वाट्याला येऊ नये, याकरिता उपरोक्त प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे शोधण्यासाठी सदरील लेख प्रस्तुत करीत आहे.
अत्यंत कर्तव्यनिष्ठ, सद्गुणी, दानशूर, प्रजाहितदक्ष, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणारा राजा म्हणून बळीराजाला ओळखत. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजाची उपमा दिली जाते. 'थोडक्यात, संपन्न राजाने एक संपन्न राजव्यवस्था स्थापन केली होती.' त्या व्यवस्थेतीलच एक वर्ग बळीराजाच्या विरोधात होता.
बळीच्या राज्यावर वर्चस्व मिळविणे अशक्य असल्याने विरोधकांनी छळ-कपटाने बळीराजाला ठार मारून राज्याची सत्ता आपल्या हाती घेतली. प्रजेवर आलेली ही इडा-पिडा होती. याच पिडेला सामोरे जाण्यासाठी आणि बळीचे राज्य परत मिळविण्यासाठी प्रजेने बंड पुकारले.
युद्धावर जाण्यापूर्वी पुरुषांना त्यांच्या घरच्या स्त्रियांनी ओवाळले अन् 'इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो' अशी साद घातली. प्रजेने बळीसोबतच सुसंपन्न राज्यव्यवस्था देखील गमावली.
आजच्या 'शासनव्यवस्थेने' बळीराजाच्या 'राजव्यवस्थेपासून' प्रेरणा घेत शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे/धोरणे निर्माण करणे गरजेचे ठरते. 'इडा पिडा टळो आणि शेतकऱ्यांच्या हिताची व्यवस्था येवो' हीच आमची शासनदरबारी मागणी असेल..!
~ सचिन विलास बोर्डे
14/3
Festivals | Diwali | Dipawali | Baliraja | Farmer | History
Comments
Post a Comment